थंडीमुळे केळी आणि द्राक्ष बागांचे नुकसान; जाणून घ्या कसे होतेय शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

जळगाव : गत १५ दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होवू लागला आहे. विशेत: केळी व द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला आहे. वार्‍यामुळे केळीची पाने फाटत आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत आहे. तर द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत.

मध्यंतरीच्या झालेल्या अवकाळी पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे आणि त्यापाठोपाठ आताच्या वाढत्या गारठ्यामुळे केळी बागावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एकीकडे दर घटले असताना दुसरीकडे बागा जोपासण्याचे आव्हानही शेतकर्‍यांसमोर आहे. दुसरीकडे थंडीमुळे ग्राहकही मागणी करीत नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. थंडीच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून बाजारात केळीची मागणी घटलीय, त्यामुळे केळी व्यापारी आणि शेतकर्‍यांना त्यांचा फटका बसलाय.

प्लास्टिक पेपर आच्छादनाने टाळता येईल नुकसान

केळीच्या घडांना प्लास्टिक पेपर ने आच्छादन करावे तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. बागांमध्ये शकोटी करावी त्यामुले उबदार वातावरण होते. त्याचा फायदा बागांना होतो त्याच सोबत होणारे दुष्परिणाम टाळता येवू शकते.

द्राक्ष मण्यांना तडे

केवळ थंडीचा जोर वाढला असे नाही तर सकाळी पडणारे दव आणि धुके तसेच दुपारी पडणार्‍या उन्हाच्या चटक्यामुळे द्राक्ष मण्यांवर बर्निंग आणि उकड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे तर जात आहेत पण यामध्ये साखरेचे प्रमाणही कमी होत आहे. सध्याच्या वातावरणाचा परिणाम थेट द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर होत आहे. याचा विपरित परिणाम उत्पन्नावर होत आहे.

Exit mobile version