गांडूळ खत निर्मितीसाठी महत्त्वाच्या टिप्स

gandul

नागपूर : गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी उन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोडटीडा युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन खत तयार करण्याची प्रकिया ४० ते ४५ दिवसात पूर्ण होते.

गांडूळ खाताचे हे आहेत फायदे :
गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मट्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो, मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात, जमिन सुपीक राहते.

गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराचे शेड तयार करावी.
खड्डा पद्धत :
छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे.

ढीग पद्धत :
साधारणतः २.५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून
ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे सोडावीत. दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Exit mobile version