पीक विम्यासाठी आंदोलक आक्रमक; या जिल्ह्यात एसटी बस फोडल्या

st bus

उस्मानाबाद : पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचं आणि पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांना पीक विमा तातडीने मिळावा या मागणीसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे आमरण उपोषण सुरु केले आहे. यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानबादमध्ये उमटू लागले आहेत. कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, उस्मानाबादमध्ये अज्ञातांनी एसटी बस फोडल्यात. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळले.

२४ ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आंदोलन सुरु केलं होतं. शेतकर्‍यांना पीक विमा मिळावा, अशी त्यांची मागणी होती. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कैलास पाटील आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान, आमरण उपोषण करणार्‍या कैलास पाटील यांच्या समर्थनात उतरलेल्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केलं आहे. उस्मानाबादमधील वेगवेगळ्या भागात या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढतोय. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्यानं परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जातेय.

उस्मानाबादमधील शेतकर्‍यांच्या मदतीचे १२०० कोटी रुपये थकित असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच कैलास पाटील यांना प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं होतं. उपोषणामुळे कैलास पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यानं प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आपण उपोषण सोडणार नाही, अशी भुमिका कैलास पाटील यांनी घेतली आहे.

Exit mobile version