ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नितीन गडकरींनी दिला हा महत्त्वाचा सल्ला, वाचा सविस्तर

nitin gadkari

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड आणि स्पष्ट वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहतात. आता त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जर भविष्यातील समस्यांचा वेध घेवून कृषी क्षेत्रात विविधता न आणल्यास मोठे नुकसान होवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकर्‍यांनी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनावं, असेही ते म्हणाले.

आपली ६५ ते ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आपला कृषी विकासदर केवळ १२ ते १३ टक्के आहे. ऊस उद्योग आणि शेतकरी हे आपल्या उद्योगवाढीचे इंजिन आहेत. त्यामुळं उसापासून महसूल वाढवण्यासाठी पुढील वाटचाल सहनिर्मिती असावी. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे. जास्तीत जास्त सहउत्पादनं, उपउत्पादनं घेतली पाहिजेत, यामुळं शेतकरी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनतील, असंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, यावर्षी आमची साखरेची गरज २८० लाख टन असताना, उत्पादन ३६० लाख टनांपेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील परिस्थिती पहाता या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यानं आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे गडकरी म्हणाले. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता ४०० कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. बायोइथेनॉल वर चालवल्या जाणार्या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योगासाठी ही वेळ असल्याचं गडकरी म्हणाले.

Exit mobile version