नवी दिल्ली : शेतकर्यांना दिवाळीची मोठी भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुसा, दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता जारी केला. या हप्त्याअंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात २००० रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यावेळी जवळापस १० कोटी शेतकर्यांच्या खात्यावर पीएम किसानची रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र, यावेळी अपात्र ठरलेल्या शेतकर्यांना बाराव्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. या योजनेद्वारे सरकारने आतापर्यंत २५ लाख कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरित केले आहेत.
ई-केवायसी आवश्यक
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसीशिवाय पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकर्यांच्या खात्यात येणार नाहीत. १२ व्या हप्त्याचे पैसे पाठवण्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थी शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून त्यांची स्थिती तपासू शकणार नाहीत. आता नव्या नियमानुसार शेतकरी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच स्थिती तपासू शकणार आहेत.