स्मार्टअंतर्गत प्रकल्पाचे 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

oflain

जळगाव : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, असे आत्माचे प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

शेतमाल आधारीत मुल्यखळी विकासाचे उपप्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा, प्लॉट नं. 10, पुष्पराज बिल्डींग दिक्षीतवाडी, जळगाव कार्यालयात तसेच इतर उपप्रकल्प संबंधित लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात मुदतीत अर्ज सादर करावेत.

शेतमाल, शेळया (मांस व दूध) आणि परसबागेतील कुक्कूटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्य उपप्रकल्पांसाठी अर्ज आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.

जाहिराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart-mh.org यावर Call for Proposal या टॅबमध्ये आहे. यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज सादर केलेला असल्यास पुनश्च: अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून उपप्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.

Exit mobile version