राज्यातील शेतकर्‍यांना शिवछत्रपतींची शपथ…वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

eknath shinde farmer

मुंबई : कर्जबाजारीपणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकर्‍यांना एक भावनिक पत्र लिहलं आहे. तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलंय. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करतांना सरकार तुमच्या पाठिशी उभं असल्याचा विश्‍वास दिला आहे.

माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वार्‍यावर सोडून निघून जाऊ नका..आत्महत्या करू नका… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे, असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा मुख्यमंत्र्यांचे पत्र जसेच्या तसे…..
सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकर्‍यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचीच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची, देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कुणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटांतून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात… हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं….वाटतं की, आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय…. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वार्‍यावर सोडून निघून जाऊ नका… . मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा साधा सरळ माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. या अस्मानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!
जय महाराष्ट्र ! एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Exit mobile version