शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल करा, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मागणीने भाजपाची गोची

farmer succied

मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजप विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. आता खताच्या किमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी असल्याचे पटोले म्हणाले.

राज्यात ओला दुष्काळाची स्थिती आहे पण सरकार मात्र शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकर्‍यांबद्दल असंवेदनशील आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले आहे. आमची मागणी कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये व बागायती, फळबागेसाठी १.५ लाख रुपये आहे ती राज्य सरकारने तात्काळ द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

Exit mobile version