देशातील मधाचे गाव कोणते आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?

honey village

सातारा : मधमाशांची घटती संख्या शेती व पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी मधमाशांचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी ‘मधाचे गाव’ ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी दिली.

मांघर (ता. महाबळेश्वर) येथे अंशु सिन्हा यांच्या हस्ते मधपाळांना मधपेट्या वाटप करण्यात आल्या. यावेळी सिन्हा बोलत होत्या.या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, सहायक वन संरक्षक सोनवणे, मांघर गावच्या सरपंच, ग्रामसेवक व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

निसर्गातील मधमाश्‍यांची घटती संख्या चिंताजनक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांना वाचविणे काळाची गरज ठरणार आहे. मधमाश्‍यापालन आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. या उद्देशाने महाबळेश्‍वर येथील मांघर या गावात ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी दिली आहे.

राज्यातीलच नव्हे तर देशातील हे लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. महाबळेश्‍वरचा शुद्ध मध अनेक लोक घेत असतात. मधमाश्‍यांविषयीची जनजागृती प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी तसेच डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने मधाचे गाव म्हणून मांघर गावाची निवड करण्यात आली आहे.

मांघर या गावात शासनाच्या विविध योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. शिवाय या गावातील बहुतांश लोक मधमाश्‍यापालन करीत आहेत. मधाचे गाव या संकल्पनेत शासनाच्या विविध यंत्रणांचा सहभाग असेल. सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

मधमाश्‍यांचे संवर्धन व संरक्षण होण्याबरोबरच स्थानिक लोकांना कायमचा रोजगार आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम या निमित्ताने गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती सिन्हा यांनी दिली. मधाच्या गावात मधमाश्‍यांना पूरक अशा वनस्पतींची लागवड वन विभागामार्फत करण्यात येणार आहे. गावातील घरांचे मधमाश्‍यांची थीम वापरून सुशोभीकरण केले जाणार आहे. 

या गावात मधमाश्‍यापालन ते मधविक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया लोकांना पाहता येईल. मधमाश्‍यांची संख्या वाढविण्यासाठी गावात राणी पैदास कार्यक्रम व त्या अनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मधमाश्‍यांना उपयुक्त पिकांची लागवड करण्यासाठी कृषी विभागाचे साह्य घेण्यात येणार आहे.

मधमाश्‍या संवर्धनासाठी प्रयत्नशील
‘मधाचे गाव’ ही संकल्पना मधमाशांना पूरक असणाऱ्या भागात टप्प्याटप्याने राज्यातील प्रमुख जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मधाचे गाव या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेलच पण निसर्गपूरक व्यवसायास प्रोत्साहन देखील मिळणार आहे. मधमाश्‍यांचे संवर्धन होण्यासाठी खादी व ग्रामोद्योग विभाग प्रयत्नशील आहे.

मानांकनासाठी प्रयत्न : संजय गायकवाड
मांघरच्या पारंपरिक स्वरूपामधील व्यवसायाची महाबळेश्‍वर तालुक्‍यामध्ये एक वेगळी ओळख आहे. महाबळेश्‍वर बाजारपेठांमध्ये दिसणारा मध तेथील स्थानिक मधुमक्षिका पालकांचा असतो. मांघर गावामध्ये घरटी हा व्यवसाय चालतो. या मधाची शुद्धता आणि दर्जा अव्वल असून वाई, जावळी व महाबळेश्‍वर या तीन तालुक्‍यांतून 50 टन मध उपलब्ध होतो. त्यातील पंचवीस टक्के मधपुरवठा मांघर गाव करते. त्यामुळे मधुसागर मध उत्पादक सेवा सहकार सोसायटीचे तब्बल 1600 सभासद असून मांघरला “मधाचे गाव’ हे वेगळे मानांकन मिळवण्याचे आमचे विशेष प्रयत्न असल्याचे सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड यांनी सांगितले.

Exit mobile version