नाशिक : यंदा संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून काही ठिकाणी मुळे सडून गेली आहे तर काही ठिकाणी मक्याची वाढच खुंटून गेली आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून उत्पादन घटणार असा अंदाज बांधला जात आहे. यामुळे मात्र पोल्ट्री व्यवसाय करणार्या कंपन्यांना याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मक्याचे मोठे नुकसान झालेले असल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, पोल्ट्री व्यवसाय करत असतांना कोंबडीला लागणारे खाद्य तयार करतांना मक्याची आवश्यकता भासते. अतिवृष्टी झाल्याने मक्याचे उत्पादन घटल्याने दरात वाढ होई शकते आणि त्यामुळे कोंबडीचे खाद्य देखील महाग होणार आहे. कोंबडीचे खाद्य महाग झाल्याने कोंबडीच्या विक्री दरात देखील फरक जाणवणार आहे. त्यामुळे चिकनचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.