धक्कादायक: महाराष्ट्रात तब्बल इतक्या हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

farmer-suicide-shetkari-atmahatya

शेत शिवार । नवी दिल्ली : गतवर्षभरापासून कधी कोरोना, कधी लॉकडाऊन तर कधी अतिवृष्टी, पूर व गारपीटीसारख्या समस्यांमुळे शेती व शेतकरी संकटात आले आहेत. मानवनिर्मित व नैसर्गिक संकटांशी दोन हात करतांना काही शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. देशभरात २०२० मध्ये  ५,५७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. यात सर्वाधिक आत्महत्यात महाराष्ट्रात झाल्या आहेत.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की,  शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिलेले नाही. लोकसभेत लेखी उत्तर देताना त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांसह लोकांनी आत्महत्या करण्यामागच्या कारणांत कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर/व्यसन, विवाहसंबंधी मुद्दे, प्रेम प्रकरणे, कर्जबाजारीपण, परीक्षेत अपयश, बेरोजगारी, व्यावसायिक/ करिअरसंबंधी समस्या किंवा संपत्तीचा वाद यांचा समावेश आहे.

देशात, विशेषत: मध्य प्रदेशात खतांअभावी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारला मिळालेली नाही. २०२० मध्ये शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या एकूण घटनांपैकी महाराष्ट्रात  सर्वाधिक २,५६७  घटना घडल्या.  त्यानंतर  कर्नाटक (१,०७२), आंध्र प्रदेश (५६४), तेलंगण (४६६), मध्य प्रदेश (२३५) आणि चंदीगडमध्ये २२७ घटना घडल्या. उत्तर प्रदेशात २०२० मध्ये ८७ शेतकर्‍यांंनी आत्महत्या केली. त्याखालोखाल तामिळनाडू (७९), केरळ (५७), आसाम (१२), हिमाचल प्रदेश (६), तसेच मेघालय आणि मिझोराम (प्रत्येकी ४) आहे.

Exit mobile version