अति पावसामुळे तूर डाळ आणि उडीद डाळींच्या किंमतीवर होतोय असा परिणाम

udit dal tur dal

पुणे : जुलै महिन्यापासून पावसाने अनेक भागांमध्ये धुमाकुळ घातला आहे. कुठे मुसळधार तर कुठे संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान वाढत आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामात एकरी क्षेत्रामध्ये घट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आधीच कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाचा विचार केला तर तूर आणि उडदाच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूरीखालील क्षेत्र ४.६ टक्क्यांनी कमी झाले आहे, तर उडीदाखालील क्षेत्रात २ टक्क्यांची घट झाली आहे.

अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उडीद पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात मोठ्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे उत्पादक राज्य मध्य प्रदेशमध्ये उडदाचे पिक चांगले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील पिक चांगल्या स्थितीत आहे. या पार्श्‍वभूमीवर तूर डाळ आणि उडीद डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सहा आठवड्यांमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळींच्या तिंमतीत १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागच्या सहा आठवड्यात डाळींच्या किंमती ९७ रुपयावरुन ११५ रुपये प्रति किलोवर गेल्या आहेत.

पावसामुळे जरी पिकांचे नुकसान झाले असले तरी, म्यानमारमधून आयात वाढण्याची अपेक्षा असल्याने उडदाच्या किंमती स्थिर राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताला गेल्या चार महिन्यात चलनाच्या समस्यांमुळे म्यानमारकडून जास्त उडीद मिळाले नाही. ज्यामुळं मासिक उडीद आयात ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली. दरम्यान, वर्षभरापासून चढ्या राहिलेल्या मसूरच्या दरात ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कॅनडामध्ये सध्या मसूर पिकामध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. जर तूरीचे भाव मजबूत राहिले, तर मसूरच्या किंमती टिकून राहून काही प्रमाणात तूरीऐवजी मसूरला पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version