राज्यात पावसाची दमदार एन्ट्री, ‘या’ जिल्ह्यांमध्ये शेती कामांना वेग

rain-in-farm

मुंबई : मृगातले मुहूर्त साधत दोन दिवसांपूर्वी कोकणातून दाखल झालेला पाऊस आता राज्य व्यापत आहे. (Rain Updates in Maharashtra) राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्याही घटना घडलेल्या आहेत. मात्र पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. गत 48 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. (Heavy rains in the state, speed up agricultural activities in these districts)

नाशिकात मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातील कांदा व्यापाऱ्यांचे कांदा गोडाऊन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी बियाणे घेण्यासाठी लगबग सुरू झाली असून पेरणी लायक पाऊस पडला. तर सुरगाणा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. तर वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात अनेक गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. यावल व रावेर तालुक्यात अनेक नदी, नाले दुथळी भरून वाहून निघाले. मात्र अनेक ठिकाणी केळीचे नुकसान झाले.

अकोल्यात जोरदार पाऊस, खताची पोतेही भिजले विर्दभातील अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्हातल्या शिवापूर रेल्वे स्टेशनवर असलेल्या माल धक्यावर जोरदार आलेल्या पावसामुळे सिमेंट आणि खताची पोते भिजली असून यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात शनिवारी काही तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. उशीरा का होईना पण मृगात पाऊस झाल्याने आता पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे. मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदियात विजेच्या कडकडाटासह बरसला, पेरणीसाठी जरा थांबा गोंदिया जिल्ह्यातही शनिवारी रात्री उशीरा विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पावसाने सुरवात केली असली तरी हा पाऊस पेरणी योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाल्यावरच खरिपातील पेरणीला सुरवात करावी लागणार आहे.

Exit mobile version