शेतकऱ्यांना कृषिपंप वीजबिल कोरे करण्याची संधी, जाणून घ्या कशी?

farmer-light-bill

फोटो प्रतीकात्मक

मुंबई : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीचे १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. आता चालू वीजबिल आणि येत्या मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना तब्बल १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपयांची आणखी माफी मिळणार आहे. सोबतच थकीत वीजबिल देखील कोरे होणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च २०२२ पर्यंत थकबाकीची ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये माफ होणार आहेत. या संधीचा लाभ घेतल्यास राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिलांच्या थकबाकीची माफी मिळणार आहे.

१६ लाख ४२ हजार शेतकऱ्यांचा सहभाग; ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल कोरे

आतापर्यंत राज्यातील १६ लाख ४१ हजार ९७० शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ९४५ कोटी ०९ लाखांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीपोटी ७६९ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. योजनेनुसार या सर्व शेतकऱ्यांचे व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण ४९९२ कोटी १९ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. तर योजनेचा लाभ घेत राज्यातील ३ लाख ५० हजार ३३८ शेतकऱ्यांनी वीजबिल कोरे केले आहे. या शेतकर्‍यांकडे १०२० कोटी ६५ लाखांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी चालू वीजबिलांचे १८४ कोटी ९२ लाख रुपये तसेच ५० टक्के थकबाकी म्हणजे ५१० कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. या शेतकर्‍यांना थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे ५१० कोटी ४३ लाख रुपयांची माफी मिळाली आहे.

औरंगाबाद प्रादेशिक विभागात ११ लाख २१ हजार ३६६ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी आणि बिल दुरुस्ती समायोजनेद्वारे ५६९१ कोटी ७४ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. आता चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीच्या ८६४५ कोटी ५१ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे ४३२२ कोटी ७६ लाख रुपये देखील माफ होतील.

पुणे प्रादेशिक विभागात १२ लाख ५० हजार ६९० शेतकऱ्यांचे २८४० कोटी ११ लाख रुपये माफ करण्यात आले असून ८००१ कोटी ८५ लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास थकबाकीचे उर्वरित ४००० कोटी ९३ लाख रुपये माफ होतील.

नागपूर प्रादेशिक विभागात ९ लाख २ हजार २८२ शेतकऱ्यांचे २५०४ कोटी ७३ लाख रुपये माफ करण्यात आले असून ४५९३ कोटी ५९ लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास थकबाकीचे उर्वरित २२९६ कोटी ८० लाख रुपये माफ होतील.

कोकण प्रादेशिक विभागात ११ लाख ७६ हजार ४९० शेतकऱ्यांचे ४३२६ कोटी ७४ लाख रुपये माफ करण्यात आले असून ९२०० कोटी ८० लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास थकबाकीचे उर्वरित ४६०० कोटी ४ लाख रुपये माफ होतील.

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांच्या  मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी आणि बिल दुरुस्ती समायोजनेद्वारे १९०४ कोटी ७८ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. आता चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीच्या ३५१७ कोटी ६६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे  १७५८ कोटी ८३ लाख रुपये माफ होतील.

Exit mobile version