पुणे : भारत हा कृषी प्रधान देश आहे, असे आपण नेहमीच अभिमानाने म्हणतो. या अभिमानाच्या मुकुटात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. कारण आशियातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ भारतात लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे देशातील १५ हून अधिक राज्यातील शेतकर्यांना थेट लाभ मिळणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठेच्या उभारणीसाठी सुमारे ८ हजार कोटी रुपये खर्च आले आहेत.
आशियातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ हरियाणातील गणौरमध्ये उभारली जाणार आहे. ज्यामध्ये शेतकर्यांना लवकरच फळे, फुले, भाजीपाला आणि धान्यासाठी एकच बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या उपक्रमामुळे देशातील १५ हून अधिक राज्यांतील कोट्यवधी शेतकरी कोणत्याही अडचणींशिवाय आपला माल विकून चांगला नफा कमावू शकणार आहेत. कृषी बाजाराची जवळपास सर्व औपचारिकता शासन आणि प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून साधारणत: सप्टेंबर २०२२ मध्ये ही बाजारपेठ सुरु होईल.
ही आहेत या बाजारपेठेची प्रमुख वैशिष्ठे
१) दशलक्ष टन क्षमतेच्या या बाजारपेठेत फळे, फुले, भाजीपाला, धान्य, दुग्धजन्य पदार्थ यांचा व्यापार होऊ शकतो.
२) या बाजारपेठेच्या माध्यतातून शेतकर्यांना पुरवठा साखळी, कोल्ड स्टोरेज, गोदाम, रेल्वे वाहतूक आणि ऑनलाइन मार्केटिंगच्या सुविधांशी देखील जोडले जाईल.
३) या बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या मानकांनुसार निर्यातीसाठी कृषी मालाची खरेदी-विक्रीही केली जाईल.
४) मार्केटमध्येच शेतकरी आणि बाजारात काम करणार्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था, लोडिंग वाहनांची पार्किंग, व्यापार्यांसाठी सोयीची दुकाने आणि रेफ्रिजरेटर वाहनांचे व्यवस्थापन असेल.
५) या कृषी मार्केटमध्ये मासळीसाठी स्वतंत्र वातानुकूलित व्यवस्था तयार करण्यात येत आहे.