उरल्यासुरल्या पीकालाही फटका; वाचा कुठे आणि किती नुकसान झाले

dhule crope damege

प्रतिकात्मक फोटो

मुंबई: यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उरलेसुरले पीक शेतात असताना गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने तडाखा दिला असून, शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती आहे. पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यभरात सर्वत्र गडगडाटासह पाऊस पडेल आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी अजूनच धास्तावला आहे.

जळगाव, नाशिक, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये सोंगणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला पाण्याचा वेढा पडला आहे. अन्य पिकंही पाण्याखाली आली आहेत. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कापणीला आलेला मका, ज्वारी व बाजरी पिकेही नष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे खरिप हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे कपाशी पीक खराब होत आहे, तर कापणीला आलेली मका, ज्वारी व बाजरीची पिकेही नष्ट होण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्यात वेचणीवर आलेला कापूस आणि मिरचीचे नुकसान झाले आहे. कापूस ओला झाला तर लाल मिरचीची प्रतवारी खराब होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली आहे. या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. उस्मानाबाद, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात पिके पुन्हा पाण्यात गेली आहेत.

पुढील चार दिवस धोक्याचे
८ ऑक्टोबर : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
९ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल.
१० ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र आणि उ. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडेल.
११ ऑक्टोबर : मुंबई, म. महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पाऊस पडेल.

Exit mobile version