नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना होणार ५० हजार रुपयांचा फायदा; वाचा अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत (Mahatma Phule Karj Mafi Yojana) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून, सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलतांना दिली.

दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तर दोन लाखावर कर्ज असणार्‍यांनी वरच्या कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनेअंतर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकर्‍यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करू, अशी घोषणाही अजित पवार यांनी या वेळी केली.

कोरोनामुळे राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाउनमुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटीचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Exit mobile version