बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मेटिंग डिस्टर्बन्स’तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग; जाणून घ्या सविस्तर

bondali cotton

जळगाव : कापूस उत्पादक शेतकर्‍यांची सर्वात मोठी डोकंदूखी म्हणजे बोंड अळी! बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात तर घट होतेच शिवाय इतर पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. बोंड अळीचा फैलाव रोखण्यासाठी आतपर्यंत अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या असल्यातरी बोंड अळीचे संकट कमी झालेले नाही. आता बोंड अळीला रोखण्यासाठी ‘मेटिंग डिस्टर्बन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कापूस उत्पादित २३ जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचाही समावेश आहे.

बोंड अळीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अनेक उपाय योजना करुनही बोंड अळीला रोखता आलेले नाही. शेतकर्‍यांनी कमी कालावधीत येणार्‍या वाणांना प्राधान्य दिले आहे. शिवाय फरदडचे उत्पादन न घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर फेरोमोन ट्रॅप व इतर पूरक उपयांच्या अंमलबजावणी करण्यात आली मात्र, बोंड अळीचा धोका कायम आहे. यामुळे आता बोंड अळीला रोखण्यासाठी ‘मेटिंग डिस्टर्बन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

‘मेटिंग डिस्टर्बन्स’ या तंत्रज्ञानात बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक रसायनाचा वापर केला जाणार आहे. हे गंधक झाडाच्या विशिष्ट भागात लावल्यानंतर मादी पतंगाच्या गंधाने नर याकडे आकर्षित होतील. पण त्याठिकाणी वारंवार जाऊन देखील मिलनासाठी मादी पतंग न मिळाल्याने ते परत येतील. त्यामुळे मिलन प्रक्रिया होणारच नाही शिवाय अंडी घालण्याच्या क्रियेमध्ये अडसर निर्माण झाल्याने नव्याने अळीची निर्मितीच होणार नसल्याची ही पध्दत आहे.

Exit mobile version