लाल मिरचीचा ठसका महागला

red-chilli-market

पुणे :  अवकाळी पावसामुळे मिरची पिकावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले आहे. परिणामी यंदा लाल मीरचीचा ठसका चांगलाच महाग होणार आहे.  शेती मालाच्या उत्पादनावर त्याचे दर ठरतात. आवक वाढली तर दरात घट होते. आणि कमी झाली तर दरात वाढ होते. हे बाजार पेठच सुत्र आहे. यंदा वर्षी वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला. गतवर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे दर वाढले असले तरी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न यामध्ये मिळाले नाही. शिवाय लाल मिरचीचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. लाल मिरची शिल्लक नाही त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होईल असे व्यापारी व्यक्त करीत आहे.

जून महिन्यामध्ये मिरची लागवड होते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांमध्ये हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. डिसेंबर महिन्यापर्यंत हिरव्या मिरच्याचे उत्पादन घेतले जाते या नंतर महिना भरामध्ये लाल मिरचीचे उत्पादन सुरु होते. लाल मिरची ही झाडावरच लाल झाल्यावर तिच्या तोडणीला सुरवात केली जाते. साधारण: जानेवारी अखेरी ही काढणी सुरु होते. मात्र, यंदा या दरम्यान तापमानात मोठी घट झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता.

आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना गेल्या दोन-तीन महिन्यांत अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या राज्यातील मिरचीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी पुण्यात मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर परिणाम झाला असल्यानेच हिरवी आणि लाल मिरची महाग झाली आहे. तसेच येत्या काही महिन्यांत अशीच परिस्थिती राहणार असल्याने मिरचीचे आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

पुणे शहरात मागणीच्या तुलनेत हिरव्या मिरचीची आवक कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हिरव्या मिरचीचे प्रतिकिलोचे दर १५० रुपयांच्या पुढे गेले आहेत. पुण्यात दोन महिन्यांपूर्वी लाल मिरचीचे दर १४० ते १५० रुपये प्रतिकिलो होते. मात्र, मध्यंतरी अवकाळी पावसामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील लाल मिरचीला फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या शहरात प्रतिकिलोचे दर १८० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

आवकही घटली

गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून हिरव्या मिरचीची केवळ ८ ते १० ट्रक, तर लाल मिरचीचे केवळ दोन ट्रक दररोज आवक होत आहे. अवकाळीमुळे उत्पादनावर मोठ्या परिणाम झाल्याने मागील काही दिवसांत आवकीवर विपरीत परिणाम झाला आहे.प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन स्वयंपाकात मिरचीची गरज लागतेच. त्याशिवाय स्वयंपाक शक्य नाही. मात्र, मिरची उत्पादक राज्यातील उत्पादन अवकाळी पावसाने घटले आहे. त्यामुळे मुख्यत: मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने हिरवी मिरची आणि लाल मिरचीच्या दरात जवळपास ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version