मेळघाटातील मधाला वाईल्ड हनी म्हणून ओळखतात. जंगलात आग्या माशांच्या वसाहतीमधुन नैसगिकरित्या तयार होणाऱ्या मधात औषधी गुण जास्त प्रमाणात असतात. तसेच या मधाला इतर पद्धतीने तयार होणाऱ्या मधापोक्षा जास्त किंमत मिळते. याचा अभ्यास करुन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने मेळघाटातील जंगलामध्ये पारंपरिक पद्धतीने मध गोळा करणाऱ्या आदिवासींना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. तसेच त्यांच्याकडून मधसंकलन करुन आदिवासींना मोठा रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. विशेष म्हणजे सिपना महाविद्यालयाच्या सहकार्याने चिखलदरा येथे विदर्भस्तरीय मध संकलन व प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ करुन मेळघाटमधील मधाला ‘वाईल्ड हनी’ अशी नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. या वाईल्ड हनीमुळे आदिवासीच्या जीवनात निश्चितच गोडवा निर्माण होईल.
मेळघाटमधील चिखलदरा व धारणी तालुक्यात तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात आग्या माशांच्या वसाहती आढळून येतात. खादी ग्रामोद्योग मंडळाने मेळघाटमधील 200 गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात येथील स्थानिक आदिवासी पारंपरिक पद्धतीने मध संकलन करीत असल्याचे आढळून आले. पारंपरिक पद्धतीने गोळा केलेल्या मधापासून 10 टनापर्यंत उत्पादन मिळते. त्यामुळे चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच निसर्गातील मधमाशांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग मंडळाने पहिला टप्यांत येथील 50 आदिवासींना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन करणाऱ्या आदिवासींकडून निश्चित दरानुसार व मानकानुसार मंडळाने मध संकलीत करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 300 किलो मध संकलित केले आहे.
चिखलदरा येथील सिपना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुमक्षिका पालनावर पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. विद्यार्थ्यांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात मधप्रक्रिया युनिट सुरु केले आहे. सिपना महाविद्यालयाच्या सहकार्याने या प्रक्रिया युनिटचा उपयोग खादी ग्रामोद्योग मंडळ आदिवासींनी संकलित केलेल्या मधावर प्रक्रिया करण्यासाठी करणार आहे. तसेच बॉटलिंग व पॅकींग करुन मंडळाच्या मधुबन ब्रॅडखाली ‘वाईल्ड् हनी’ या नावाने हे मध विक्री करण्यात येणार आहे. या माध्यमातून येथील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पारंपरिक मधसंकलनामुळे मधमाशांचा नाश
चिखलदरा व धारणीमध्ये आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मध संकलन करतात. आग्या माशांच्या वसाहतीला धूर देवून, जाळून, मधमाशांना मारुन, पोळी पिळून मध गोळा करतात. अशा पद्धतीने मध गोळा केल्याने परिणामी पोळ्यावर नव्याने निर्मिती होणाऱ्या मधमाशांचा नाश होऊन उत्पत्ती थांबते. तसेच पोळी पिळून मध गोळा केल्याने मधात अंडी, अळ्या, लारवा, मेण इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे मधाचा दर्जा निकृष्ट होऊन असा मध खाण्यास अयोग्य ठरतो. शिवाय अशा मधाला बाजारपेठेत चांगला दर मिळत नाही.
मधमाशा शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त
कामकरी मधमाशा या एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर पराग व मकरंद गोळा करण्यासाठी सतत फिरत असतात. त्यांच्या या वैशिष्टपूर्ण स्वभावामुळे त्यांचा उपयोग परागीभवनासाठी इतर किटकांपेक्षा अधिक होतो. शेतकऱ्यांनी शेतात मधपेट्या ठेवल्यास मधमाशांमुळे मोठ्या प्रमाणात परागीभवन होऊन शेती उत्पादनात 5 ते 40 टक्के पर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाशांचा उपयोग शेती उत्पादन वाढविण्यासाठी करुन घेणे आवश्यक आहे. विदर्भात मधुमक्षीका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मध यापूर्वी महाबळेश्वर येथील मधसंचनालय येथील विक्रीसाठी पाठवावे लागत होता. मात्र चिखलदरा येथे मधसंकलन व प्रक्रिया केंद्र सुरु केल्यांमुळे विदर्भातील मधपाळ शेतकऱ्यांना याच्या फायदा होणार आहे.
लेखक – मनिषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती