कोट्यावधी रुपये खर्च करुनही हवामान खात्याचे ‘अंदाजपंचे अंदाज’

crime

मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रुप वाटतं…कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी, कोणी राजीनामा मागत नाही, कोणतीही कारवाई नाही…विशेष म्हणजे कोणी सिरियसली घेतच नाही.’ हा मेसेज सोशल मीडियावर वाचण्यात आला. यातील गमतीचा भाग सोडला तरी ही गम्मत कटू सत्यावर आधारीत आहे.

यंदा वेळेपुर्वीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यांनर किमान चार ते पाच वेळा सुधारित अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र अद्यापही अपेक्षित पाऊस झालेलाच नाही. यामुळे पेरण्या रखडल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असला तरी अपेक्षित बरसत नाही हे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. त्यानंतरही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली नाही. तुरळक ठिकाणीच मुसळधार पाऊस पडत असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अद्यापही कोरडाच आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे. मात्र हा पाऊस देखील पेरण्यांसाठी योग्य नसल्याने अजूनही खरिपातील पेरण्या ह्या रखडलेल्याच आहेत.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. मात्र संपूर्ण देशाचा अन्नदाता असलेला बळीराजा गेल्या तीन वर्षांपासून संकटांच्या दृष्टचक्रात अडकला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी वाढत्या महागाईमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यंदा दमदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. सरासरीपेक्षा जास्त पाऊस १०० टक्के, ११० टक्के पाऊस, ११५ टक्के पाऊस… अशा घोषणांचा व अंदाजांचा पाऊस मे महिन्यांपासून पडत आहे. यामुळे यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी देखील केली. मात्र जून महिना निम्मा संपत आला तरी पाऊस बेपत्ता असल्याने हवामान खात्याच्या अंदाजांवर आता विचार करण्याची वेळ आली आहे.

देशातील मान्सूनबाबत सर्वत्र उत्सुकता असताना भारतीय हवामान खात्यासह खासगी संस्था ‘स्कायमेट’ने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे भाकीत केले होते. मात्र प्रत्यक्षात १५ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही! दरम्यान काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दमदार पाऊस झाला. मात्र हा मॉन्सून आहे का अवकाळी पाऊस यावरूद स्कायमेट ही खाजगी संस्था व भारतीय हवामान खात्यात वाक्युध्द रंगले होते. आधीच हवामान खात्याचे नैऋत्य मोसमी वारे व अग्नेय मोसमी वारे असे जड शब्द सर्वसामान्यांच्या पचनी कधीच पडत नाही. येत्या २४ तासात दमदार पाऊस पडेल असा अंदाज तर्वविल्यानंतर कडक ऊनं पडतं व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे किंवा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबला… असा सुधारित अंदाज जाहीर करण्यात येतो.

या यंत्रणेवर शासन कोट्यावधी रुपये खर्च करत असतांना अशा अंदाजपंचे अंदाजांवर किती दिवस अवलंबून राहावे लागेल याचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाहीतर शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ कधीच येणार नाही. एकी कडे शेतकरी आत्महत्या वाढत असतांना देशाच्या पोशींद्याला पिकं पेरण्या कधी करायच्या या बाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही! हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे. आताही नैऋत्य मोसमी वार्‍याने विदर्भाचा काही भाग कव्हर करुन गुजरात आणि मध्य प्रदेशात आगेकूच केली आहे. कोकणासह मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सून प्रगतीपथावर असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. किमान हवामान खात्याचा हा अंदाज तरी बरोबर येवो, हिच ईश्‍वरचरणी प्रार्थना…..

Exit mobile version