कांदा खरेदीची चौकशी करण्याची वेळ का आली?

onion 1

पुणे : अतिरिक्त उत्पादनामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. राज्यातील कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात आहे. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कांद्याचे दर सावरण्यासाठी शासनाने, मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर वेगवेगळे आहेत. नाफेडमार्फत किमान १५ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जाईल, ही अपेक्षा होती. मात्र कांदा खरेदी दहा रुपये किलो दरापेक्षा कमी दराने होत आहे. प्रत्यक्ष शेतकर्‍यांकडून नावापुरता कांदा खरेदी केला जात आहे. बाकी कांदा व्यापार्‍यांकडूनच खरेदी केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

स्वस्तात खरेदी केलेला कांदा पुढे जास्त दराने खरेदी केला, असे रेकॉर्ड तयार करून शासनाला लुटण्याचे प्रकार मागील खरेदीच्या वेळेस झाले होते. या वेळेस देखील तसे प्रयत्न होतील, अशी शंका घनवट यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. शैलेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रकार सुरू असल्यामुळे त्यांना तातडीने या पदावरून हटवून एका प्रामाणिक अधिकार्‍याची नियुक्ती करावी. अन्यथा, १५ जून नंतर पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा घनवट यांनी दिला.

Exit mobile version