केळी उत्पादक शेतकरी संकटात; संकटातून बाहेर पडण्यासाठी निवडला ‘हा’ टोकाचा मार्ग

banana-farms

केळीची बाग

जळगाव : एकीकडे वातावरणातील बदलामुळे पडणारे विविध कीडरोग तर दुसरीकडे घसरणारे दर, अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. परिणामी केळीला ठरलेल्या दराच्या तुलनेत यंदा निम्यानेही दर मिळत नाही. यामुळे हताश झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी थेट केळी बाग उपटून फेकण्याचा मार्ग निवडलेला दिसत आहे.

निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहे. याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. गत महिन्यात राज्यात काही ठिकाणी केळीवर करपा रोग पडल्यामुळे काही शेतकर्‍यांनी पूर्ण बागच उपटून फेकली किंवा त्यावर ट्रॅक्टर चालविला, अशा बातम्या वाचण्यात आल्या.  मुळात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने नुकसान होत आहे. केळीला १ हजार रुपये क्विंटलचा दर हा ठरलेला असतांना व्यापारी २५० ते ३०० रुपये दराने खरेदी करत आहेत. जर व्यापार्‍यांना अशी मनमानी करायची असेल तर रावेर केळीबोर्डचे भाव काढण्याचीच गरज नाही, असा संताप शेतकऱ्यांकडून करण्यात येवू लागला आहे.

शासन किंवा प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक झळ सहन करावी लागते. वर्षभर जोपासना करुन ३०० रुपयांचा दर कसा परवडेल असा प्रश्न आहे. त्यामुळेच शेतकरी काढणी आणि वाहतूकीचा खर्च करण्यापेक्षा केळीच्या बागेवर कुर्‍हाड चालवणे पसंत करीत आहे. परिणामी शेतातून केळी बाहेर काढण्यापेक्षा बागच बाहेर काढण्याचा टोकाचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version