पीक पध्दतीत बदल आवश्यक, अन्यथा होवू शकते मोठे नुकसान

crope

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मात्र उत्पादनात फारशी वाढ होतांना दिसत नाही. कपाशीच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने कपाशीची महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता केवळ २.९३ किंटल प्रती हेक्टर इतके आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च अधिक आणि उत्पादकता अतिशय कमी असल्यामुळे खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने कपाशी लागवड करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत तसेच ते कर्जबाजारी होत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून तिथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांची लागवड करुन शाश्‍वत शेती उत्पादन साधण्याची गरज आहे. जेथे अत्यंत भारी काळ्या जमिनी आहेत तेथे व बागायत क्षेत्रात कपाशी लागवड करणे हिताचे आहे. त्यासाठी शेतकरीवर्गास सातत्याने प्रशिक्षित करणे गरजे आहे. तसेच तूर, घेवडा, मका, मिरची, सोयाबीन या पिकांचे उन्नत वाण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

रुंद-वरंबा व सरी पद्धत वापरणे :
मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय म्हणून रुंद-वरंबा व सरी पद्धतीचा वापर वाढवणे गरजेचे असून सोयाबीन व घेवडा या दोन्ही पिकांची पेरणी रुंद-वरंब्यावर करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळे हेक्टर उत्पादकता वाढू शकेल.

रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे :
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे तयार करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याचा आकार ठेवावा. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड व पाट टाकल्यास कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात व पावसाचे पाणी वाफ्यात मुरते. योग्य ओलीवर पेरणी केल्यास पुन्हा होणार्‍या पावसाचे पाणी वाफ्यात मुरते आणि ज्वारीचे वाढीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे हेक्टरी ३० टक्के उत्पादन वाढते. ही मुलस्थानी जलसंधारणाची पद्धत रब्बी ज्वारीसाठी वापरणे आवश्यक आहे.

बागायत क्षेत्रात गव्हाचे पिकाचे क्षेत्र कमी करून बागायत रब्बी ज्वारीची पेरणी करून पीक पद्धतीत बदल करावा. हवामान बदलाने जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यातच थंडीचा चांगला कालावधी मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केल्यास आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात थंडी न मिळाल्यास गव्हाचे पीक, त्याच्या अवस्था लवकर गव्हाची उत्पादकता कमी होते. शिवाय गव्हाचे पीक गारपिटीत सापडते. त्याऐवजी ऑक्टोबर महिन्यातच बागायत रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी ज्वारीचे पीक निघते. गारपिटीत सापडत नाही. शिवाय कडबा जनावरांना उपयुक्त ठरतो. जनावरांचा चान्याचा प्रश्न मिटतोर. घरच्या माणसांसाठी उत्तम धान्य उत्पादन होते. त्याशिवाय रब्बी ज्वारीचे भाव वाढलेले असल्याने आर्थिक फायदा अधिक होतो.

रब्बी हंगामात हरभरा पिकाखाली क्षेत्रात वाढ करणे : हरभरा हे कमी पावसावर व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. जेथे २ पाणी उपलब्ध असतील तेथे बागायत हरभन्याची लागवड करावी. तर कोरडवाहू हरभर्‍याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. त्या सार्‍यांमध्ये पावसाचे पाणी मुरेल आणि हरभन्याची उत्पादकता वाढेल.

सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब :
पाण्यात बचत करण्यासाठी ठिबक सिंचन वापरल्यास ५० टक्के पाणी वापरात बचत होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या बागायत क्षेत्रात दुप्पटीने वाढ करणे शक्य आहे. त्यासाठी बंद पाइपने पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात द्रवरूप खते दिल्याने अधिक व चांगल्या प्रतीचे सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन काढणे शक्य होईल व ५० टक्के पाणी बचत करणे शक्य होईल.

संरक्षित शेतीचा अवलंब करणे : पॉलिहाऊस मध्ये ढोबळी मिरची, जरबेरा, कानेंशन, गुलाब, टोमॅटो इत्यादी पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. प्रत्येक शेतक-याने कमीतकमी १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊची उभारणी करून ठिबकद्वारे पाणीपुरवठा व द्रवरूप खते देऊन उत्तम प्रतीचा शेतीमाल तयार करून उत्पादन व उत्पादकता वाढवावी.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे :
एकपिक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची आहे. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन बोनस मिळते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (२:१), सोयाबीन + तुर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. तसेच बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + फुलकोबी किंवा कोबी, अशा प्रकारे अनेक आंतरपिके जिरायत आणि बागायत क्षेत्रात घेणे शक्य आहे.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Exit mobile version