महावितरणाच्या असहकार्यामुळे शेतकऱ्यांना पीकांसाठी मिळेना पाणी

mahavitaran

सोलापूर : जिल्ह्यातील विविध भागांत तीन तासांचे भारनियमन करीत, महाविरणतर्फे गावनिहाय वेळापत्रक तयार केले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. 

सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, लवकरच ४४ अंशाच्या पुढे जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या उपलब्धतेमध्ये तूट निर्माण झाली होती. सध्या कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या विजेमध्ये २०००-३००० मेगावॉटपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे.

 पाणी पाईलाइनच्या बाहेर पडण्यापूर्वीच वीज गुल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठवड्यात काही भागासाठी दिवसा तर काही भागासाठी रात्री थ्री फेज आठ तास वीज पुरवठा केला जातो, यामध्ये त्या ट्रांसफार्मरवर असणाऱ्या मोटारी सुरू राहतील, पिकांना पाणी मिळेल या आशेवर शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात थांबत असताना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक गावचे शेतकरी संतप्त झाले आहेत.

६ ते १० वाजेपर्यंत काटकसरीने वीज वापरा

उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे २५ हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

फोर्स लोडशेडिंगच्या नावाखाली वीज बंद

मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा कमी होत असेल तर महावितरण फोर्स लोडशेडिंगच्या नावाखाली गावागावातील वीजपुरवठा तीन ते चार तास बंद करते. रोहित्रांवर भार येऊ नये, विद्युत केंद्रात बिघाड होऊ नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

हे पण वाचा :

Exit mobile version