या दोन पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त!

जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे अनेक ठिकाणीची पिकं वाहून गेली. जी पिकं उरली होती त्यांचेही अवकाळी पाऊस व गारपीटींमुळे नुकसान झालं. यामुळे तसे पाहिल्यास खरिप हंगामातून शेकर्‍यांच्या हाती काहीच आलं नाही. कापूस व सोयाबीन या पिकांनी काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी त्यांच्या दरातील चढउतार शेतकऱ्यांची डोकंदूखी ठरत आहे. मात्र आता नवीन वर्षात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला शेतमाल बाजारात आणायला सुरुवात केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक चित्र निर्णाण होतांना दिसत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळाला. काही शेतकर्‍यांना तब्बल १० हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देखील मिळाला. नंतर हा दर ८ ते ९ हजार रुपयांदरम्याना स्थिर राहिला. भविष्यात कापसाचे दर वाढतील, या आशेने अनेक शेतकर्‍यांना कापूस बाजारात न आणता त्याच्या साठवणीवर भर दिला. यामुळे बाजारात अपेक्षेप्रमाणे कापूस उपलब्धच झाला नाही. मात्र दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कापडाला मागणी वाढल्याने उद्योगांकडून कापासालाही मागणी वाढली होती. त्यातच उत्पादन कमी होण्याचा अंदाज आणि शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेली टप्प्याटप्प्याने विक्री, यामुळे कापसाचे दर सुधारले. तसेच कापूस आणि कापडाची निर्यात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी कायम आहे. यातच गतआठवड्यात तर विक्रमी दर मिळालेले आहेत. येणार्‍या काळातही कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता अनेक व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

सोयाबीनच्या दरात सुरुवातीपासून चढ उतार कायम आहेत. आठ दिवसांपूर्वीच सोयाबीनच्या दरात ३५० रुपयांची वाढ झाली होती तर पुन्हा दोन दिवसांपूर्वी १०० रुपयांची घसरण झाली आहे. डिसेंबरच्या शेवटापर्यंत जवळपास ६० ते ७० टक्के सोयाबीन शेतकर्‍यांनी विकलेले असते. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे. व्यापार्‍यांच्या मते आतापर्यंत निम्मेही सोयाबीन बाजारात आले नाही. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात करूनही आणि तेलबिया, सोयापेंडवर साठा मर्यादा लावूनही दरात घसरण झाली नाही. सध्या सोयाबीन ५ हजार ८०० ते ६ हजार २०० पर्यंत आहे. सध्या कोरानामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता येणार्‍या काळात सोयोबीनच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता नसली तरी त्याच्या दरातही घसरण होण्याची शक्यताही कमी आहे. यामुळे शेतकर्‍यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version