ऐकावे तर नवलच! हळद शेतीमाल नाही, भरावा लागणार जीएसटी

नवी दिल्ली : अनेक शेती पारंपारिक पिकांऐवजी हळद, बटाटा, पपई आदींचे उत्पादन घेत असतात. शेतीमालावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. मात्र आता महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले आहेत. त्यांच्या निर्णयानुसार, हळद हा शेतीमाल नसल्याचा दावा यांच्यावतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वाळलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीला ५ टक्के जीएसटी (5% GST on Turmeric) हा भरावाच लागणार आहे.

हळद हा शेतीमाल आहे की नाही? यावर अनेक महिन्यांपासून खल सुरु आहे. गेल्या २ वर्षांपासून हळद हा शेतीमालच असल्याचा दावा व्यापारी हे करीत होते. मात्र, अखेर यावर निर्णय झाला असून महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने हळदीला शेतीमाल नसल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या नव्या निर्णयामुळे वाळलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीला ५ जीएसटी अदा करावाच लागणार आहे. आडतदारांना मिळणार्‍या कमिशनवर हा जीएसटी असणार आहे. मात्रा त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर देखील होणार आहे. कारण आडत्यांना ही रक्कम अदा करावी लागणार असली तरी मुळात हळदीची खरेदी करतानाच हळदीच्या दरात पाच टक्के कपात होईल, अशी भीती हळद उत्पादक शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

अगोदर हळदीचे दर कमी असताना जीएसटी लागू झाल्याने पुन्हा हळदीच्या दरात घसरण झाली तर त्याचा फटका हळदीच्या क्षेत्रावर देखील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हळद हा पूणेपणे शेतीमालच आहे कारण उत्पादन घेण्यापासून थेट वाळविण्यापर्यंत सर्व प्रक्रिया शेतकरी आपल्या शेतातच करत असतो, यामुळे यावर जीएसटी लावणे चुकीचे असल्याचे अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

उत्पादनात घट होण्याची भीती

हळदीची लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत साधारणत: ५० ते ६० हजाराचा खर्च येत असतो. बियाणे खरेदी, लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी, काढणी आणि काढल्यानंतर पुन्हा शिजवून त्याची फिनिशिंग प्रक्रियेचा यामध्ये समावेश केला जातो. हा सर्व खर्च पाहता प्रति क्विंटल ८ ते ९ हजार रुपये दर मिळाला तरच हे पीक परवडते. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी बाजारपात हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र पुढील हंगामाविषयी शेतकर्‍यांना आतापासूनच चिंता सतावू लागली आहे. केल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणार्‍या वातावरणामुळे हळदीवर करपा, कंदकुजी या रोगांचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

Exit mobile version