राज्यात सव्वा कोटी क्विंटल धान खरेदी; वाचा सविस्तर

dhan

मुंबई : राज्यसरकारने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली आहे. यंदा खरीप हंगामात एक कोटी २२ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी दिली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १९४० रुपये इतका दर दिला जातो. यंदा राज्यातील २८५३ खरेदी केंद्रांवर धान खरेदी करण्यात आले या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या एक कोटी २२ लाख क्विंटल धानापोटी राज्यसरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना २६०० कोटी रुपये दिले आहेत. यातील साडेसातशे कोटी रुपये अद्यापही देणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

विपणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ही धान खरेदी करण्यात येते धान खरेदीमध्ये मुख्यत्वे पूर्व विदर्भातील पाच जिल्हे आणि कोकणातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना धानाचे पैसे त्यांच्या खात्यावर ऑनलाइन पाठवले जातात हे पैसे त्यांना सात दिवसात मिळतात अशी माहितीही तुंगार यांनी दिली.

राज्यातील धान खरेदी केंद्रांवर साडेपाच लाख शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपली नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे सव्वाचार लाख शेतकरी यांनी धान दिले आहे. यावर्षी सुमारे दोन कोटी धान खरेदी संपूर्ण वर्षात करण्याचा शासनाचा मानस आहे गेल्यावर्षीही खरेदी एक कोटी साठ लाख क्विंटल इतकी झाली होती. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी साठी समिती नेमण्यात येते ही समिती धान साठवणुकीसाठी गोडाऊन पासून सर्व व्यवस्था पाहते. त्यामुळे धान्य साठवणुकीसाठी कोणतीही अडचण येत नसल्याचा दावा तुंगार यांनी केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस देण्यात आला होता. पाच एकर क्षेत्राच्या मर्यादेत हा बोनस दिला जातो. मात्र यंदा धानाचे उत्पादन अधिक झाल्याने तसेच राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बोनस देण्यात आलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा :

Exit mobile version