थंड नव्हे दुष्काळी वातावरणात घेतले स्ट्रॉबेरीचे उत्पादन; जाणून घ्या कसे?

strawberry-farming

सातारा : महाबळेश्‍वर, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, नाशिकसारख्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. कारण स्ट्रॉबेरी हे फळ केवळ थंड हवेतच घेतले जाते. मात्र सातारा तालुक्यातील खटाव सारख्या दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन घेवून दाखविले आहे, सचिन कोचरेकर व प्रशांत भोसले या दोन प्रयोगशिल शेतकर्‍यांनी!

या दोन्ही शेतकर्‍यांनी गेल्या ऑगस्टमध्ये तीस गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबरमध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली. आता रोज पंधरा हजारांप्रमाणे महिन्याकाठी पाच लाखांची उलाढाल सुरू झाली आहे. उन्हाळी भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे ही किमया कशी साधली गेली? याची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी बांधावर येवून पाहणी देखील करत आहेत.

या अनोख्या आणि धाडसी प्रयोगाबाबत माहिती देतांना सचिन कोचरेकर म्हणाले की, थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची? हे आमच्यासमोर आव्हान होतं. यासाठी महाबळेश्‍वर मधील तज्ञ शेतकर्‍यांना आम्ही या ओसाड जमिनीवर आणलं. या उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती करायची असल्याचं त्यांना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला त्याबाबत मार्गदर्शन केलं. गेली तीन वर्षे आम्ही यावर अभ्यास केला, मग यशस्वीरित्या हा प्रयोग करुन दाखविला. या प्रयोगामुळे परिसरातील अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

आंतरपीकातून उत्पादनात भर

प्रशांत भोसले सांगतात की याच स्ट्रॉबेरी मध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली. सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आलीये. उर्वरित क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेणार आहोत. आंतरपीकामुळे त्यांच्या उत्पादनातही मोठी भर पडली असून. आता मोठा विश्‍वास प्राप्त झाला असल्याचे ते सांगतात.

हे देखील वाचा :

Exit mobile version