डाळिंबाची निर्यात वाढवण्यासाठी असे सुरू आहेत विशेष प्रयत्न

Pomegranate

सोलापूर : राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी अभियान राबविले आहे. त्यामुळे यंदा राज्यासह देशातून डाळिंबाची निर्यात करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. आतापर्यंत देशातून २ हजार ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली.

आज भारत देशाचा विचार केला तर चीन पाठोपाठ कृषि उत्पादनात जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, आंबा, डाळिंब, केळी या फळांच्या उत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेमुळे फळबागांखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. आज कृषि क्षेत्रामध्ये उत्पादन व विक्रीपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून येत आहेत. जागतिक बाजारपेठेत टिकून राहायचे असेल तर शेतकरी बंधूंनी गुणवत्तेबरोबरच स्वच्छता, उर्वरित अंश नियंत्रण इ. गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

याशिवाय निर्यातीमधील मध्यस्थांचा सहभाग कमी करून डाळिंब उत्पादकाचा थेट निर्यातीमधील सहभाग वाढविणे व परदेशातील विविध बाजारपेठ भारतीय डाळिंबांना उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघ, पुणे, फलोत्पादन संचालनालय, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय बागवानी बोर्ड गुरगाव (हरियाना) आणि राज्य कृषि पणन मंडळ पुणे, महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे, यांचेमार्फत जोमाने होत आहे.

देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून डाळिंब युरोपसह अन्य देशांत डाळिंबाची निर्यात केली जाते. गतवर्षी देशातून २४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. डाळिंब पिकावर गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचे संकट असले, तरी काटेकोर नियोजन करत शेतकरी डाळिंबाच्या बागा साधत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत देशातून डाळिंब निर्यात करण्यासाठी २ हजार ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात ३ हजारांहून अधिक डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी होण्याची शक्यता आहे.

राज्यातून डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मात्र गतवर्षी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले असल्याने सुमारे ९०० ते १००० शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी केली होती. परंतु डाळिंब निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असली तरी, पावसामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला होता. परिणामी, राज्यातून डाळिंबाच्‍या निर्यातीला फटका बसला होता. मात्र यंदाच्या हंगामात देखील पावसाचा फटका पिकाला बसला असला, तरी डाळिंब निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक नोंदणी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात राज्यातून ९२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

डाळिंब कृषि निर्यात क्षेत्र
डाळिंब निर्यातीसाठी पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नाशिक हे जिल्हे कृषि निर्यात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची या कामासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे

हे देखील वाचा :

Exit mobile version