हमी भाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात का विकली जातेय तुर? वाचा सविस्तर

नागपूर : शेतमालाला योग्य हमीभाव जाहीर झाल्यास शेतकर्‍यांना कसा फायदा होतो? याची प्रचिती तुरीवरुन येत आहे. राज्यात हमीभाव केंद्र सुरु होण्याआधी तुरीला कमी भाव मिळत होता मात्र केंद्र सुरु होताच खुल्या बाजारातील भाव वाढत आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे.

१ जानेवारीला राज्यात १८६ ठिकाणी तुर हमीभाव खरेदी केंद्र उभारल्यानंतर तुरीच्या दरात वाढ होऊ लागली. त्यावेळी खुल्या बाजारात तुरीचे दर हे ५ हजार ८०० पर्यंत होते मात्र नाफेडने यंदा तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हा हमीभाव ठरवून दिला.

यामुळे शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करता येईल या अनुशंगाने कागदपत्रांची पूर्तता करुन नोंदणी केली खरी मात्र, आता प्रत्यक्ष विक्री करताना हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत दर वाढल्याने शेतकर्‍यांनी खुल्या बाजारात तुर विक्रीला प्राधान्य दिले आहे. सध्या बाजारपेठेतील दर हे ६ हजार ५०० वर येऊन ठेपले आहेत.

पिकाच्या नोंदणीपासून ते विक्री केलेल्या मालाचे पैसे पदरी पडेपर्यंत किचकट प्रक्रिया ही खरेदी केंद्रावर असते. विक्रीपूर्वी नोंदणीकरिता कागदपत्रांची पूर्तता शिवाय नोंदणीनुसारच विक्री केली जाते. आर्द्रतेचे प्रमाण हे १० टक्के पेक्षा अधिक असले तर स्विकारले जात नाही. शिवाय बीलाचे पैसे देखील शेतकर्‍यांना वेळेवर मिळत नाही, असा आजवरचा अनुभव राहिला असल्याने शेतकरी खुल्या बाजारालाच अधिक पसंती देतांना दिसत आहेत.

Exit mobile version