पुणे : शेती जोडधंदा म्हणून मधमाशा पालन केले जाते. मात्र आता या जोडधंद्याला स्वतंत्र व्यवसायाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अलीकडच्या काही वर्षात मधाचे गाव या नवीन संकल्पनेचा उगम झाला. मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही मधाच्या गावची संकल्पना आहे. महाबळेश्वरमधील मांगर या गावात ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविली गेल्यामुळे या संपूर्ण राज्यात या गावाची ओळख मधाची गाव म्हणून झाली. या संकल्पनेतून वर्षभरात १ लाख किलो मध गोळा केला जातो.
‘मधाचे गाव’ ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात राबवली जाते. यंदा पुन्हा एकदा मांगर गावाचीच यात निवड करण्यात आली असून या गावापासूनच या योजनेचा राज्यव्यापी कामाचा १६ मे पासून शुभारंभ होणार आहे. मधमाशी पालन व्यवसायाला उभारी मिळावी म्हणून उद्योग खात्याचाही पुढाकार राहिलेला आहे. या वर्षभराच्या कालावधीसाठी २७ हजार पेट्या मधमाशा पाळण्यासाठी दिल्या जातात.
या व्यवसायातील मुख्य खर्चच उद्योग खात्यातर्फे उचलला जातो. त्यामुळे रोजगार देखील उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत व्यवसायाच्या स्वरुपातून याकडे पाहिले जात नव्हते पण आता उद्योग खात्यामुळे याला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. उद्योग विभागाच्या पुढाकाराने ग्रामीण भागात स्वयंरोजगारचे नवे दालन खुले झाले आहे. आता याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावरच या योजनेचे यशापयश अवलंबून राहील.