मुंबई : काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे स्वरुपही बदलत आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढवून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. त्याच अनुशंगाने शेती व्यवसयात ‘ड्रोन’चा वापर वाढवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशाच्या विविध भागातील 100 किसान ड्रोनच्या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 100 ठिकाणच्या ‘किसान ड्रोन यात्रेला’ (Kisan Drone Yatra) हिरवा झेंडा दाखवला आहे. ड्रोन वापरासाठी सरकारचा पूर्णपणे पाठिंबा राहणार असून भारत या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व करेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. देशात सध्या 100 हून अधिक ड्रोन-स्टार्टअप कार्यरत आहेत. अवघ्या काही दिवसांमध्येच ही संख्या हजारोंच्या घरात जाईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. ड्रोन हे एक तंत्रज्ञान असून त्याचा शेती व्यवसायात तर उपयोग होणारच आहे पण इतर क्षेत्रातही वापर वाढवून या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.
भारताकडून ‘ड्रोन’ क्षेत्रामध्ये घडेल क्रांती
ड्रोनचा वापर हा युध्दांमध्ये किंवा तंत्र देशाच्या सीमेवरच वापरले जाते असा एक समज होता. काळाच्या ओघात या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. भारतात ड्रोन मार्केटची एक नवीन इकोसिस्टम विकसित होत आहे. यामुळे तरुणांना रोजगार तर मिळणार आहेच पण ड्रोन क्षेत्राचा नवा उद्य हा भारतामध्येच होणार आहे. अशा नव्या उपक्रमाला केंद्र सरकारचे कायम पाठबळ राहणार आहे. देशात गरुड एरोस्पेसने एक लाख ड्रोन विकसित करण्याचा निर्धार केला आहे. या कंपनीला शुभेच्छा आणि यामाध्यमातून हजारो य़ुवकांना तंत्रज्ञाबाद्दल शिक्षण घेता येत असल्याचेही मोदी यांनी सांगितले आहे. उद्योगांसाठी कोणता अडथळा तर नाहीच पण केंद्र सरकारची योग्य ती धोरणे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘ड्रोन’च्या माध्यमातून शेती व्यवसयात अमूलाग्र बदल
मानसेर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 100 हून ड्रोन स्टार्टअपला हिरवा झेंडा दाखवला. शिवाय ऑनलाईन उपस्थित असलेल्या शेतकरी आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी होणार असून योग्य वेळी शेतीकामे होणार आहेत. याचा उत्पादनवाढीवर परिणाम होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. किसान ड्रोन सुविधाने शेती क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला आहे आणि ड्रोन तंत्रज्ञानासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा :