मुंबई : गायी-म्हशींवर लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राजस्थानमध्ये तर आतापर्यंत ७५ हजार जनावरे दगावलेली आहेत. याचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना हाती घेतल्या असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. यामुळे जनावरांसाठी विशेष लसीकरण मोहिम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
उत्तरेकडील राज्यांकडून लम्पीचे संकट महाराष्ट्रात देखील गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पशूपालन हा शेतकर्यांचा मुख्य जोड व्यवसाय आहे. शेती उत्पदनात कमी-अधिक झाले तरी याच जोड व्यवसायावर शेतकर्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून २०२५ पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले जात आहे. जगभरातील १५६ तज्ञ हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादन वाढीसाठी ही परिषद महत्वाची राहणार आहे. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी लम्पीवरील लसीची घोषणा केली आहे.