नाशिक : ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर आता आदित्य ठाकरे देखील शेतकर्यांच्या बांधावर पोहचले आहेत. आदित्य ठाकरेंनी नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली गावच्या स्थानिकांनी आत्ता भेट घेऊन दिलेले निवेदन स्विकारले आणि त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेतले.
धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत!, असा विश्वास आदित्य यांनी शेतकर्यांना दिला. सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील संपत रामनाथ शिंदे व दत्तात्रय धोंडू शिंदे ह्या शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन भेट घेतली. अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन धीर दिला. बळीराजा व्यथीत आहे, अडचणीत आहे, पण महाराष्ट्राचा अन्नदाता हरलेला नाही, शिवसेना त्याच्यासोबत आहे, असे आदित्य यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्ताधार्यांकडून आत्ता तरी शेतकर्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झाले आहे. शेतकर्यांसोबत उभे राहाणे गरजेचे आहे. त्यांना जाऊन धीर देणे एवढे जरी केले तरी पुरेसे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. दरम्यान सरकारकडून कुणीच विचारणा केली नसल्याची व्यथा शेतकर्यांनी आदित्य ठाकरेंजवळ व्यक्त केली.