जळगाव : केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. यंदा अर्थसंकल्पात केळीचा फळामध्ये समावेश करण्याचा निर्णय होताच रावेर शहरातील शेतकरी, व्यापार्यांनी केळीच्या खोडाचे पूजन केले. त्यानंतर केळी पिकाची शहरात ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागाचे मोठे नुकसान होत होते. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती.
अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ आता केळी उत्पादकांना घेता येणार आहे. यामुळे आता केळी उत्पादकांना अच्छे दिन येतील असा विश्वास शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.