मुंबई : राज्यात शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनला होता. ऊस गाळपास जात नसल्याने बीड तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव या तरुण शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:ला जाळून घेतले होते. यानंतर शेतकरी संघटनांचे नेते आणि ऊस उत्पादक शेतकरीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. आता शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. शेतकर्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शेतकर्यांच्या हितासाठी दिनांक १ मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये २०० प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता, शेतातील ऊस नक्कीच कारखान्यात जाईल आणि आपलं नुकसान टळेल हीच आशा सर्व शेतकर्यांना आहे.