जळगाव : जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यात ३१ मे रोजी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. काही भागांमध्ये गारपीटही झाली. यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात पाणी व वीज टंचाईचा सामना करत जोपासलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावल तालुक्यातील परसाडे, हिंगोणा, चिंचोलीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळासह पूर्वमोसमी पावसाने सुमारे पाऊणतास तडाखा दिला. सावखेडा सिम गारपीट झाल्याने बागायती पिकांचे नुकसान झाले. चुंचाळे परिसराला सायंकाळी वादळाचा व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या वादळामुळे अनेक शेतकर्यांची केळी आडवी झाली. सायंकाळी ६ वाजेपासून वादळाला सुरुवात झाली. ते सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरु होते. चिनावल, कुंभारखेडा, गौरखेडा शिवारात केळीचे नुकसान झाले.
सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या सावखेडा सिम व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वार्यासह गारपिटीने तडाखा दिला. वादळी पावसामुळे उन्हाळ्यात मेहनतीचे जगवलेली केळी मातीमोल झाली. रावेर तालुक्यातील अहिरवाडी, पाडळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेत शिवाराला सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. यात कापणीवर आलेली केळी उन्मळून पडली. त्यात सुमारे १० कोटींचे नुकसान झाले. दरम्यान वादळग्रस्त भागाची पाहणी करून दोन दिवसात केळीसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठ्यांना देण्यात आले आहेत.