पुणे : उन्हाळी हंगामात महाबीज (Mahabeej) कंपनीने बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना () निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे देऊन फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा बारामती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव बुरुंगले यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.
बारामती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची महाबीजने सोयाबीन बियाण्यात फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी महाबीजकडून बियाणे घेतले, परंतु त्याला फुले किंवा शेंगा आल्या नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्यांनी खाजगी कंपनीचे बियाणे घेतले त्यांच्या पिकाला मात्र फटका बसला नाही. परंतु बारामती तालुक्यातील अनेक गावातील लोकांची महाबीजने फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त आहे. अशातच महाबीज कंपन्यांकडूनदेखील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. जानेवारी २०२२ मध्ये महाबीज कंपनीने फुले संगम या सोयाबीन वाणाचे शेतकऱ्यांना वितरण केले होते. बियाण्यांची वेळेत पेरणी, मशागत, खत व्यवस्थापन झाले असतानादेखील पिकांना फूल, फळ लागलेले दिसून आले नाही. पिकांची महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून यासंबंधी कुठलीच कारवाई केली नाही.
सोयाबीन पिकांसाठी शेतकऱ्यांनी एकरी २५-३० हजार रुपये खर्च करूनदेखील आता उत्पन्न मिळणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बारामती युवक काँग्रेसने केली आहे.
हे देखील वाचा: