परभणी : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अशा चार प्रादेशिक विभागांमध्ये सोयाबीनचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. मात्र दरवर्षी भेसळयुक्त बियाण्याच्या शेकडो तक्रारी येतात. परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी २०२१ च्या खरीप हंगामात ६२.८८ हेक्टरवर पेरणी केलेल्या सोयाबीनच्या १५२ पिशव्यांमध्ये भेसळयुक्त बियाणे असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
२०२१ च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये अन्य वाणांच्या बियाण्याची भेसळ असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी चार तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली होती. त्यात जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २२ तक्रारी, परभणी, सेलू तालुक्यातील प्रत्येकी चार आणि पाथरी तालुक्यातील पाच तक्रारींचा समावेश आहे.
कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली असता एका बियाणे उत्पादक कंपनीच्या सोयाबीनच्या बियाण्यामध्ये अन्य वाणांची ३६ ते ८२ टक्के भेसळ आढळून आली. त्याअनुषंगाने अहवाल कृषी आयुक्तलयाकडे पाठविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भेसळ्युक्त बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ अदा करावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी केली आहे.
असे राखून ठेवा सोयाबीनचे बियाणे
- ज्या शेतामधील बियाणे आपण राखून ठेवणार आहोत त्या शेतामधील भेसळ झाडे काढून टाकावीत. भेसळ म्हणजे साधारण पिकापेक्षा कमी किंवा जास्त उंचीची, वेगवेगळ्या रंगाची फुले व शेंगा असलेली तसेच रोगट झाडे काढून टाकावीत.
- कीड व रोगाचा योग्य बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. जेणेकरून साठवणुकीच्या काळात बुरशीची वाढ होणार नाही.
- शेताच्या चारही बाजूच्या शेतात जर त्याच वाणाचे सोयाबीन बियाणे असेल तर ठीक. अन्यथा ज्या बाजूस त्या वाणाचे बियाणे नाही, त्या बाजुच्या बांधापासुन ३ मिटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्या वेळी घेऊ नये.
- बियाणाची कापणी वेळीच करावी. कापणीनंतर किंवा काढणीनंतर पावसात भिजलेले सोयाबीन बियाणांसाठी राखून ठेऊ नये. उन्हात चांगले वाळवावे व पावसात भिजणार नाही त्यासाठी उपाययोजना कराव्यात.
बियाणे साठवताना घ्यायची काळजी
- कापणीनंतर सोयाबीनच्या शेंगावर बुरशी येईल, अशा पद्धतीने साठवणूक करू नये.
- कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता १३-१४% आसपास आणण्यासाठी १ ते २ दिवस उन्हात बियाणे सुकविण्यात यावे आणि त्यानंतर मळणी करावी. उत्पादित बियाण्याची आर्द्रता १४% असेल तर मळणी यंत्राचा वेग ४०० ते ५०० ठझच आणि १३% असल्यास वेग ३०० ते ४०० आरपीएमच्या मर्यादेत असावा. बियाणातील आर्द्रता व मळणीचा वेग दिलेल्या मर्यादेत कमी किंवा जास्त झाला तर उत्पादित बियाणामध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते.
- साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता ९-१२% राहील याची काळजी घ्यावी.
- सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते त्यामुळे भरलेली पोती कोरड्या हवेत ठेवावीत. ती उन्हात व दमट हवेत ठेवू नये.
- बियाणे १०० किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलो पोत्यांमध्ये असल्यास पोत्यापेक्षा जास्तची थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणाची उगवण शक्ती कमी होते. तसेच पोत्याची थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंमी. च्या वर लाकडी फळ्यावर लावावी.
- पोत्याची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होते.
- पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
मार्गदर्शनासाठी येथे साधा संपर्क
अशा प्रकारे बियाणे निर्मिती काढणी व साठवणकीच्या काळात काळजी घेत उगवणशक्ती असलेले बियाणे निश्चितच आपणं घरच्या घरी निर्माण करू शकतो. अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती कृषी विभागाने केले आहे.