सोलापूर : राज्यभरात सध्या उन्हाचा पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याने लिंबू (Lemon) उत्पादकांना अच्छे दिन आले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल २५० रुपये किलो असा लिंबाला दर मिळत आहे. म्हणजेच एक लिंबू जवळपास १० रुपयांना मिळत आहे. हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये उन्हात प्रचंड वाढ झाली आहे. शीतपेयासाठी लिंबाचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी किरकोळ विक्रेते येऊन बसत आहेत. ऐन लिंबा बागा बहरात असतानाच वातावरणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. आता दर चांगला आहे पण माल कमी अशी अवस्था आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५० रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय आतापर्यंत मागणी तेवढा पुरवठा झाला आहे. पण असेच ऊन वाढत गेले तर मागणीत वाढ आणि पुरवठ्यात कमी अशी स्थिती ओढावणार आहे. त्यामुळे भविष्यात लिंबाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे.
हे पण वाचा :