नाशिक : कांदा उत्पादकांची संकटांची मालिका संपायचे नावच घेत नाहीए. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरल्यामुळे (Onion Market Rate) अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यातून काहींनी मार्ग काढत कांदाचाळीत साठवणूक केली. आता कुठे कांद्याचे दर वाढत असतांना मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचा कांदा भिजून खराब झाला आहे. (Loss of Onion Growers)
गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वार्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास ७०० क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले.
त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतले चित्र बदलत असताना आता ७०० क्विंटल कांदा भिजल्याने हे नुकसान कसे भरुन काढले जाणार हा प्रश्नच आहे.