मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रीय झाला असला तरी जोर मात्र, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणावरच कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात जवळपास चारही विभागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. ८ जुलै रोजी तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी तुरळक ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे राज्यात पावसाचेच राहणार आहेत.
आतापर्यंत मर्यादित क्षेत्रावर बरसत असलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्र व्यापाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून असलेले सातत्य सात दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे खरीप पेरणीसााठी आवश्यक असलेला पाऊस जवळपास सर्वच विभागात झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामे मार्गी लागत आहेत. उशिरा का होईना दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये समधान व्यक्त होत आहे.