नंदुरबार : अतिवृष्टीनंतर आलेले अवकाळी पावसाचे संकट, वातावरणातील बदलांमुळे मुख्य पीकं व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठी मिरची बाजारपेठ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. गत महिनाभरापासून मिरचीची आवक सुरु झाली आहे. सध्या नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत ४ हजार रुपये क्विंटल लाल मिरचीला दर आहे. गेल्या ५ वर्षात यंदा सर्वाधिक दर मिळाला असून भविष्यात मागणी वाढली तर दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १ लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही ४ हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकर्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये १ लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. असे असतानाही दर हे टिकून आहेत. विशेष म्हणजे शेजारच्या राज्यांमधून देखील येथे मिरचीची आवक सुरु आहे.
विविध पिकांचे बाजारभाव जाणून घेण्याकरता येथे क्लिक करा.