पुणे : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून मान्सून अनियमित असाच राहिलेला आहे. सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याला मुसळमार देत शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत आहे. वायव्य भारतातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी ३ दिवसांमध्ये राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे.
यंदा नियमित वेळेपेक्षा मान्सूनचे आगमन हे उशिरा झाले होते. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने दडी दिल्याने पेरण्या रखडल्या होत्या. आता परतीच्या प्रवासाला देखील उशिर होत आहे. यंदा निसर्गाचा लहरीपणा राहिलेला असला तरी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
गत आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुढच्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरी तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरच परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे.
राज्यातील पाऊस लवकरच परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत मॉन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे.