नाशिक : ऐन कापणीला आल्यानंतर किंवा विक्रीसाठी बाजारत आल्यानंतर टोमॅटोच्या दरा होणारी घसरण ही दरवर्षी शेतकर्यांची डोकंदूखी ठरते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकर्याने एकरी ४० हजार रुपये खर्च करुन टोमॅटोची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले व नुकसानीतून कशाबशा वाचविलेल्या टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिस्थिती अशी निर्माण झाली की पिकं काढणीचा खर्चही जास्त येणार म्हणून शेतकर्याने हतबल होत उभ्या पिकांमध्ये मेंढ्या सोडून दिल्या.
मनमाडच्या पानेवाडी येथील साहेबराव गंभीरे या शेतकर्याने एक एकरात टोमॅटोची लागवड केली होती. त्यांना बियाणे, मशागत, ठिबक, मल्चिंग, खत, औषधे, मंडपासाठी तार, बांबू,सुतळी, मजुरी आदीसह इतर कामे धरून एकरी सुमारे ४० हजार रुपये खर्च आला होता. सुरुवातीला दमदार पाऊस झाला त्यामुळे पिक देखील चांगले आले होते. मात्र, त्यानंतर सलग मुसळधार पाऊस झाला असून अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाचा फटका इतर पिकांसोबत टोमॅटोला देखील बसला आहे.
अतिवृष्टीमुळे टोमॅटो करपासह इतर रोगाच्या विळख्यात सापडून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त टोमॅटो खराब झाले आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. एकीकडे उत्पादनात गट तर दुसरीकडे भावात झालेली घसरण यामुळे पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्च निघत नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या साहेबराव यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला.