जालना : जून महिन्याच्या तोंडावरही राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. याबाबत राज्य सरकारची ठोस भुमिका नसल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटला आहे. काही दिवसांपूर्वीच एका शेतकर्याने शेतात ऊस पेटवून दिला होता आता जालना जिल्ह्यातील एका शेतकर्याने ऊसावर रोटावेटर फिरवले आहे.
या उसाची नोंद छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग या कारखान्याकडे होती. कारखान्याकडे नोंद करुनही ऊसाची तोड न झाल्याने जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकरी दाजीबा राऊत यांनी दोन एकरावरील ऊसावर रोटावेटर फिरवून क्षेत्र रिकामे केले आहे. कारखान्याची तर तोड नाहीच पण मालक तोडीसाठी ४५ हजाराची मागणी केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा जालना जिल्ह्यात असल्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयानेच सादर केला होता.
दाजीबा राऊत यांचे २ लाखाचे नुकसान झाले आहे शिवाय वेळ आणि परीश्रम हे वेगळेच. ऐवढे करुनही त्यांना आता खरीप हंगामात पेरणी करावी कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे. खरिपातील पूर्व मशागत, पेरणी, नांगरणी यासाठी पैशाची गरज असताना ऊसातून एक रुपयाचेही उत्पन्न राऊत यांना मिळालेले नाही.
अल्पभूधारक असलेल्या शेतकर्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसताना या शेतकर्यांनी आता पुढे खरीप हंगामाची तयारी कशी करावी? हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.