सांगोला, जि. सोलापूर : खोडकिडीनं गेलेली डाळिंब बाग काढून टाकायलाही आता पैसे नाहीत. कर्ज देणं तर त्याहूनही अवघड झाले आहे. पण, लेकरांचे पोट तर भरावेच लागेल, त्यासाठी बांधावरची झाडं तोडून विकण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात डाळिंबाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगोल्यातील शेतकऱ्याच्या अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. डाळिंब पंढरी असलेल्या सांगोल्यात खोडकिडीनं मोठ्या प्रमाणात पाय पसरलेत, अजनाळे, एकतपूर, कडलास, जवळा, कमलापूर, सोनंद, वाटंबरे, संगेवाडी, घेरडी, महूद, अचकदाणी अशा सर्वच भागांत या खोडकिडीने बागा संपवल्या आहेत. राज्यातील एकूण सव्वादोन लाख हेक्टरपैकी किमान ७० टक्के क्षेत्र एकट्या सांगोल्यात आहे. पण त्यापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित केले. सांगोल्यात अक्षरशः बागा काळवंडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांपुढे हा रोग कसा थांबवता येईल, हा एकमेव प्रश्न पडला होता. यातून विविध प्रकारे औषध फवारणी करून देखील तेल्या रोग शेतकऱ्यांना आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी इंदापूर तालुक्यातील डाळिंबाच्या बागा उत्पादनाविना वाया गेल्या होत्या.
यावर्षी शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागेतून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल, अशी आशा असतानाच मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने बागेतील झाडांना फुलकळी लागलेली होती. ती फुलकळी गळून पडली. बागेतील ज्या झाडांना साधारण 200 च्या पुढे फळ लागत होते. त्या झाडांना फक्त आत्ता पंचवीस ते तीस फळे लागलेली आहेत. त्यामुळे डाळिंब बागाचे एकरी उत्पादन हे साधारण चार ते पाच टन निघण्याऐवजी एक ते दोन टन एवढेच डाळिंबाचे उत्पादन निघणार आहे. अशी शक्यता सध्या दिसत आहे.
सध्या ज्या डाळिंबाच्या बागांना फळे लागलेली आहेत. त्या बागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली आहे. त्यामुळे साधारण मे ते जून यादरम्यान डाळिंबाची विक्री केली जाते. परंतु यावेळी अजूनही मोठ्या पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हातात ज्या काही डाळिंबाच्या बागा उरलेल्या आहेत. त्याही पूर्णपणे संपून जाऊ शकतात. याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. डाळिंबाच्या बागांना मर रोगाने ग्रासले आहे. झाडांना मर रोग लागल्यानंतर हे झाड बुडापासून पूर्णपणे वाळून जाऊन निकामी होत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
डाळिंब उत्पादनापेक्षा डाळिंबाच्या बागा जगवण्यासाठी खर्च ज्यादा लागत आहे. दरवर्षी डाळिंबाच्या बागांवर नवनवीन रोग पडत असल्याने निसर्गही ही शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डाळिंबाच्या उत्पन्नाला तर शेतकरी पूर्णपणे मुकलेला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागाही उद्ध्वस्त झालेले आहेत. इंदापूर तालुक्यात फळबागांचे मोठे प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे नगदी उत्पन्न घेणारा शेतकरीही हतबल झाला आहे.