नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याचा देशातील लाखों शेतकर्यांना फायदा होणार आहे. नव्या निर्णयानुसार शेतकर्यांच्या ३ लाख लाख रूपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ३४ हजार ८५६ कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना या नव्या योजनेची माहिती देतांना सांगितले की, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या पाऊलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्या दृष्टीने आज निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.