मुंबई : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापैकी काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे. यामुळे नागरिकांना तप्त उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गत २४ तासांपासून तापमानाचा पारा देखील घसरला असून अधूनमधून ढगाळ वातावरणाचा अनुभव देखील येत आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापुरसह मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेडमध्येही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री १२ च्या सुमारास वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली.
नैऋत्य मोसमी वार्यांचा प्रवास सुरु झालाय. मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागल्याने पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात हे वारे दाखल होण्याचा अंदाज आहे. या वेळी सोसाट्याच्या वार्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस बरसेल, अशी शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम बंगालसह ईशान्येकडील सात राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
साधारणत: असा असतो भारतातील मान्सूनचा प्रवास
सर्वप्रथम २० मे च्या सुमारास अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.नंतर १०जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा, पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे.